Tuesday, December 29, 2009

भर वैशाखातला कृष्णमेघ
चांदण्या मोजून सुध्दा हिवाळ्यातल्या
वैराणरात्री सरत नाहीत,
मग दिवस मोजून
आक्रसणारे आयुष्य कसे काय
थांबवणार ?
अमावस्येकडे वळणा-या चंद्रासारखा
चेहरा निस्तेज पडत जातो
मग हूरहूर उरते ती
खोल गर्तेकडे घेवून जाणा-या
अवकाशव्यापी अंताची.
आक्रमक कैफांच्या भुकंपानी
हादरणा-या माड्या एक एक
करत कोसळत जातात
अन
भूसभूशीत जिने पाय
मातकट करत
सा-या जगण्याची धूळदान
करतात,
उरते ते एक धूळट भावना
प्रत्येक सकाळी येणा-या
शिळ्या सूर्यप्रकाशावर
तरंगणारी.
प्रखर उन्हाळ्यात वितळणा-या हिमासारखे
वजन घटत जाते,
त्याचे तनग्रासी भय वजनकाटा
थरथरत दाखवत असतो
मग आरश्यात रोज बदललेला
नवा चेहरा दिसतो,
आयुष्य व्यापणा-या
काळ्याकुट्ट ढगांची वर्तुळे
डोळ्याभोवती रासलीलांचा फेर
धरतात
तेव्हा वैशाखातल्या कृष्णमेघासारखे
एकटे एकटे वाटते.
जीवनरस शोषून सारं
वैफल्यग्रस्त जगणं
हाडांचा सांगाडा करतं
मग हौसेने घेतलेले वासने
शरीरावर,
बुजगावण्यावर पांघरल्या सारखी
वाटतात,
मग Ray Ban चा गॉगल चढवून
बाहेर पडायचं,
कुणालाही न बघता,
बघणारे मात्र सारा बदल टिपत
"टिप्पणी ' देत राहतात
अन
टीपकागदासारखं सारं टिपून घेत
मन गडद होतं,
सारं शरीर काळवंडायला लागतं.
पहाट चुकवायची नाही
अन रात्र गमवायची नाही
सारा पाठशिवणीचा खेळ
खेळावाच लागतो
one side ,
हार तर नित्याचीच
टाळता न येण्यासारखी
मग
कधी तरी ती म्हणते
तू पूर्वीसारखा राहिला नाहीस !
तेव्हा मात्र रात्रभर डोळे
पूर्वरंगाची वाट पाहत
निजेला थारा न देता
जागतात.
कधीतरी मधेच रामप्रहरी डोळा
लागतो,
तिच्या चांदीच्या घंटीची किनकिन डोळे
किलकिले करते,
नवा दिवस बघून मन
हायसं होतं
जाळणारा सूर्य
गोठविणा-या रात्रीची आठवण
देत राहतो
अन
आरसा
बदललेला चेहरा दाखवत
क्रूरहास्य पसरवतो
मग मी
पायाखाली विस्कटलेल्या रांगोळी सारखा
पसरत जातो.
विजयकुमार.........
२६.१२.२००९, मुंबई

No comments:

Post a Comment